Radhakrishna Vikhe Patil : पानशेत व वरसगाव धरणांतील गाळ कमी करण्यासाठी जलसंपदामंत्र्यांचे निर्देश
पानशेत व वरसगाव धरणांमध्ये गाळ साचल्यामुळे साठवण क्षमतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे या धरणांतील गाळाचे सर्वेक्षण करून आवश्यक कार्यवाही हाती घ्यावी, असे निर्देश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहेत. विखे-पाटील यांनी नुकताच पानशेत व वरसगाव धरणांचा दौरा केला.
या दौऱ्यात विखे-पाटील यांनी धरणांच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेतला. पानशेत व वरसगाव प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा आढावा घेऊन अतिरिक्त संपादित जमिनीबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच, या धरणांवरील जलविद्युत प्रकल्पांचा नव्याने अभ्यास करून अतिरिक्त वीजनिर्मिती क्षमतेच्या दृष्टीने शक्यता तपासण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. वरसगाव धरणातील गळती कमी करण्यासाठी सविस्तर अंदाजपत्रक तयार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
याशिवाय, पानशेत धरणात 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून गाळ काढण्याचे काम सुरू असून, सुमारे दोन लाख घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी आमदार राहुल कुल, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, जलसंपदा यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश भोसले, तसेच पानशेत व वरसगाव प्रकल्पाचे उपअभियंता मोहन भदाणे व शाखाधिकारी अनुराग मारके आदी उपस्थित होते.
दौऱ्यानंतर विखे-पाटील यांनी वीर बाजी पासलकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. पुतळा व परिसराचा सुशोभीकरण आराखडा तयार करून उत्कृष्ट कामगिरी करण्याचेही आदेश त्यांनी दिले. या दौऱ्यात बांधकामाचे वर्ष, बांधकामाचा प्रकार, धरणांची साठवण क्षमता व जलविद्युत निर्मिती क्षमतेसंदर्भातील सविस्तर माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जलसंपदा मंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे पानशेत व वरसगाव धरणांची साठवण क्षमता वाढण्यास, जलविद्युत निर्मिती सुधारण्यास आणि प्रकल्पांची दीर्घकालीन टिकाऊपणा सुनिश्चित करण्यास मदत होणार आहे.