water shortage | Special Report | पाण्यासाठीची वणवण कधी थांबणार? मैलभर पायपीट करूनच मिळतंय पाणी
एका बाजूला उन्हाचे चटके वाढू लागले आहेत तर दुसरीकडे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालीय. सरकारी योजना फक्त कागदावर असल्याने अनेकांच्या वाट्याला भटकंती आलीय. त्यामुळे सरकार पाण्याच्या टंचाईवर कधी तोडगा काढणार? हा खरा प्रश्न आहे.
हिंगोली जिल्ह्यातील दिग्रस वाणी गावामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झालीय. गावातील हातपंप आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे महिलांना गावापासून एक किलोमीटर दूर असलेल्या विहिरीपर्यंत पायपीट करावी लागतेय. गावात जल जीवन मिशनचे काम सुरू आहेत मात्र ती फक्त नावालाच आहे.
ही परिस्थिती हिंगोली जिल्ह्यातील एकाच गावाची नाही आहे तर अनेक गावांचीही परिस्थिती अशीच आहे. हंडाभर पाण्यासाठी दिवसेंदिवस भटकंती करणाऱ्या महिलांचं जगणं म्हणजे संघर्षाची एक शाळा झाली आहे. सरकारच्या योजना फक्त कागदावरच असून प्रत्यक्षात टंचाईवर कायमचा तोडगा निघत नाहीय. पाणी नसल्याने अनेक लग्न समारंभ देखील पुढे ढकलावे लागत असल्याचे समजते.
पाण्याविना जीवन अशक्य आहे. पण इथे जीवनच पाण्याच्या शोधात भटकतंय, त्यामुळे सरकारने लक्ष देऊन इथल्या लोकांची पाण्यासाठीची भटकंती थांबवावी, ही गावकऱ्यांची मागणी आहे.