BJP Mumbai : कोण होणार मुंबईचा नवा महापौर? ‘या’ नावाची आहे चर्चा

BJP Mumbai : कोण होणार मुंबईचा नवा महापौर? ‘या’ नावाची आहे चर्चा

संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई महापालिकेकडे लागले आहे. ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करणाऱ्या भाजपने मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्याची शक्यता जवळपास निश्चित केली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यातील २९ महापालिकांच्या निकाल जाहीर होत असून संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई महापालिकेकडे लागले आहे. ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करणाऱ्या भाजपने मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्याची शक्यता जवळपास निश्चित केली आहे. मात्र, महापालिकेचा महापौर कोण होणार, याबाबत आता राज्यभर आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सर्वात चर्चेत असलेले नाव म्हणजे तेजस्वी घोसाळकर. मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीत त्यांनी दहिसर वॉर्ड क्रमांक २ मधून विजयी पताका फडकावली. या विजयानंतर तेजस्वी घोसाळकर यांना मुंबई महापौरपदासाठी संभाव्य उमेदवार मानले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, तेजस्वी यांची वाढती लोकप्रियता, जनसमर्थन आणि मजबूत राजकीय प्रभाव यामुळे त्यांना महापौरपदासाठी एक मजबूत दावेदार बनवले आहे. तेजस्वी घोसाळकर हे ज्येष्ठ शिवसैनिक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी अविभाजित शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता आणि तेव्हापासूvन राजकारणात सक्रिय आहेत.

तेजस्वी यांचे वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय संघर्षही चर्चेचा भाग आहेत. २०२२ मध्ये त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्हदरम्यान गोळ्या घालून हत्या झाली होती, ज्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली. या घटनेनंतर तेजस्वी यांचा समावेश भाजपच्या एका महत्त्वाच्या बँकेच्या संचालक मंडळावर करण्यात आला, जो भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रभावाखाली मानला जातो. या घटनांनी तेजस्वी यांच्या राजकीय कारकिर्दीला चालना दिली आणि पक्ष बदलाच्या चर्चांना वेग दिला.

२०२२ मध्ये वैयक्तिक कारणांमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर, तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता त्यांच्या निवडीसह, मुंबई महापौरपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव प्रमुखतेने घेण्यात येत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, तेजस्वी यांचा अनुभव, जनसंपर्क आणि राजकीय कौशल्य हे त्यांना महापौरपदासाठी योग्य उमेदवार बनवतात. मुंबई महापालिकेत महापौर निवडीच्या निर्णयानंतर शहराच्या प्रशासनात नव्या नेतृत्वाची सुरुवात होणार आहे, ज्यामुळे विकास आणि प्रशासनाच्या योजनांना नवे बळ मिळण्याची अपेक्षा आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com