KalyanDombivli : KDMC महापौर कोणाचा? महायुतीत असूनही भाजप-शिवसेनेत गुप्त हालचालींना वेग

KalyanDombivli : KDMC महापौर कोणाचा? महायुतीत असूनही भाजप-शिवसेनेत गुप्त हालचालींना वेग

कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले असले तरी महापौर पदावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले असले तरी महापौर पदावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाचे 50 आणि शिवसेना (शिंदे गट) चे 53 असे मिळून एकूण 103 नगरसेवक महायुतीकडून निवडून आले आहेत. संख्याबळाच्या जोरावर सत्ता स्थापन निश्चित मानली जात असली, तरी महापौर पद कोणाच्या हाती जाणार यावरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीत असूनही दोन्ही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली करत आहेत. विशेष म्हणजे, महापौर पद मिळवण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपकडून विरोधी पक्षातील नगरसेवकांचे समर्थन मिळवण्याचे गुप्त प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेसकडून पाठिंबा मिळवण्यासाठी काही पातळीवर संपर्क सुरू असल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) कडून उद्धव ठाकरे गटातील तीन नगरसेवक आणि काँग्रेसमधील एका नगरसेवकाशी संपर्कात असल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळे KDMC मधील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. दुसरीकडे, भाजपकडूनही संभाव्य रणनीती आखली जात असून, महापौर पदासाठी पक्षांतर्गत चाचपणी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. महापौर पदाच्या शर्यतीत शिवसेना (शिंदे गट) कडून शहरप्रमुख निलेश शिंदे, डोंबिवलीतील नवनिर्वाचित नगरसेवक विकास म्हात्रे, रमेश जाधव, अस्मिता मोरे आणि शालिनी वायले यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. तर भाजपकडून दीपेश म्हात्रे, राहुल दामले, वरुण पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पत्नी नगरसेविका हेमलता पवार, शशिकांत कांबळे आणि दया गायकवाड हे महापौर पदाचे संभाव्य दावेदार मानले जात आहेत.

एकंदरीत पाहता, KDMC मध्ये महायुतीची सत्ता जवळपास निश्चित असली तरी महापौर पदाचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात आहे. या पदावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील तणाव पुढील काही दिवसांत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पातळीवर होणाऱ्या चर्चांनंतरच अंतिम निर्णय होणार असल्याने, संपूर्ण कल्याण–डोंबिवली शहराचे लक्ष आता त्या निर्णयाकडे लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com