२६ जानेवारीला पंतप्रधान तिरंगा का फडकवत नाहीत? वाचा कारण
आज 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला. तत्पूर्वी, 26 जानेवारी 1930 रोजी देशात प्रथमच पूर्ण स्वराज दिन किंवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. पुढील 18 वर्षे या दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 हा दिवस अधिकृतपणे स्वातंत्र्यदिन म्हणून घोषित करण्यात आला.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा संविधान नसल्याने भारताचे प्रमुख पंतप्रधान होते. या दिवशी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून प्रथमच ध्वजारोहण केले. तेव्हापासून १५ ऑगस्टला पंतप्रधान नेहमी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात. तसंच डॉ. राजेंद्र प्रसाद २६ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रपती बनले होते आणि राष्ट्रपतींना देशाचा प्रथम नागरिक मानले जाते. त्यामुळेच तेव्हापासून आजपर्यंत २६ जानेवारीला राष्ट्रपती तिरंगा फडकवतात.
भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्णपणे लिहिली गेली होती, परंतु त्यानंतरही त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि 26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आली. यामागे एक खास कारण होते. वास्तविक २६ जानेवारी १९३० रोजी संपूर्ण स्वराज्याचा प्रस्ताव अस्तित्वात आला. या दिवशी तिरंगाही फडकवण्यात आला. त्यामुळेच हा विशेष दिवस म्हणजे २६ जानेवारी १९५० हा दिवस देशाच्या संविधानाच्या अंमलबजावणीसाठी निवडण्यात आला आणि २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला.