Vantara CEO On Kolhapur Madhuri : माधुरी लवकरच कोल्हापुरात येईल, वनताराचे CEO यांचं आश्वासन
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाची हत्तीण माधुरी लवकरच आपल्या मूळ स्थळी परतणार असल्याचं स्पष्ट संकेत वनताराच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या संदर्भात वनताराच्या वतीने आवश्यक पत्रव्यवहार करण्यात येणार असून, सर्वोच्च न्यायालयाकडे परत पाठविण्याची मागणी करणारी याचिका सादर केली जाणार आहे. नांदणी मठाचे मठाधिपती आणि वनताराचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात यासंदर्भात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत माधुरीला परत पाठवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही वनताराच्या सीईओ विहान करनी यांनी दिली. त्यांनी यावेळी स्पष्ट केलं की, नांदणी मठामध्ये माधुरीसाठी योग्य त्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी मदत केली जाईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर माधुरी हत्तीणीला वनताराच्या संरक्षण केंद्रात हलवण्यात आलं होतं. पण त्या निर्णयामुळे कोल्हापूरमधील नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त झाला होता. स्थानिक जनतेने सातत्याने माधुरीला परत आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आता वनताराने सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कोल्हापूरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
माधुरीसाठी नांदणी मठामध्येच एक खास पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी तिच्या आरोग्याची आणि सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल, अशी माहिती वनताराच्या अधिकाऱ्यांनी दिली. केंद्र सरकार, राज्य शासन, वनतारा आणि नांदणी मठ यांच्यात समन्वय साधून सर्वोच्च न्यायालयाकडे यासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे.
दरम्यान, माधुरी हत्तीणीच्या आरोग्य स्थितीबाबत आणि तिच्यावर होणाऱ्या कथित अन्यायासंदर्भात पेटा या प्राणीहक्क संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरून न्यायालयाने तिला वनतारामध्ये हलवण्याचे आदेश दिले होते. मात्र आता, कोल्हापुरातील जनभावना, स्थानिक परंपरा आणि नांदणी मठाचे भावनिक महत्त्व लक्षात घेता, वनताराने पुनर्विचाराची तयारी दाखवली आहे.
“या सगळ्या प्रक्रियेत कुणाचा पराजय नाही, हा माधुरीचा विजय आहे,” असं मत व्यक्त करताना विहान करनी यांनी नमूद केलं की, “वनतारामध्ये आम्ही माधुरीसाठी सर्वोत्तम सुविधा दिल्या, आता नांदणी मठातही तसाच प्रयत्न केला जाईल. कोल्हापूरकरांच्या भावना आम्ही समजून घेतल्या आहेत.” एकूणच, माधुरी हत्तीणीचा कोल्हापूरमध्ये परतीचा मार्ग आता मोकळा झाल्याचं दिसत आहे. वनताराच्या पुढाकारामुळे आणि नांदणी मठाच्या सहकार्यामुळे हत्तीणीसाठी स्थायिक, सुरक्षित आणि भावनिकदृष्ट्या पूरक ठिकाणी पुनर्वसनाची तयारी सुरू झाली आहे.