Ajit Pawar : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणार का? अजित पवार म्हणाले
थोडक्यात
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणार का?
आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत
राज्यातील लोकांचा काहीही दोष नसताना हे नुकसान झाले
गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. मराठवाड्याच्या काही भागात या पावासाचा जोरदार फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या (Flood Affected Farmers) शेतातील उभे पीक पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. लोकांचे घर, घरातील वस्तू पाण्यात वाहून गेले आहेत. या पावसामुळे हाता-तोंडाशी आलेली खरीप हंगामातील पिकं वाहून गेली आहेत. दरम्यान, याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आम्ही केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करणार आहोत, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. तसेच ओल्या दुष्काळासंदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणार का?
सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यामुळे सरकार याबाबत काही निर्णय घेणार का? असे विचारले असता, आम्ही पण विरोधी पक्षात होतो. विरोधक अशा मागण्या करतात. पण सत्तेत असताना तुम्हाला अशा घटनांमुधून मार्ग काढावे लागतात. आज राज्य सरकारचे जे नियम आहेत, ते नियम बाजूला ठेवण्याची आमची तयारी आहे. शेतकऱ्यांची मदत करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही काय-काय करता येईल यात आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत, असे सांगत अजित पवार यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची शक्यता फेटाळून लावली. तसेच आम्ही नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. या पाहणीतून आम्हाला अंदाज आला आहे. या नुकसानीची माहिती आम्ही केंद्र सरकारलाही देणार आहोत. केंद्र सरकारनेही आम्हाला भरीव मदत करावी, असी मागणी आम्ही करणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
पण आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्हीदेखील कमी पडणार नाही. आपल्या राज्यातील लोकांचा काहीही दोष नसताना हे नुकसान झाले आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने अशी परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. राज्य सरकार यात कुठेही कमी पडणार आहे. कितीतरी जमिनीवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे. पणी ओसरले गेल्यानंतर नक्की किती लाख हेक्टर क्षेत्रातील पीक अडचणीत आलेले आहे हे लक्षात येईल. त्यानंतर आपल्याला केंद्र सरकारला मदत मागता येईल. पण एक आहे की मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे. मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे. बाधित लोकांना, शेतकऱ्यांना सरकार पूर्णपणे मदत करेल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.