Raj Thackeray : मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी राज-उद्धव एकत्र येणार? राज ठाकरेंकडून युतीचे संकेत
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावेत अशी मागणी सगळीकडे जोर धरू लागली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका लग्नसोहळ्यासाठी एकत्र पाहायला मिळाले. यातच आता अभिनेते महेश मांजरेकर यांनी 'वास्तव में Truth' या कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना "समजा शिवसेना फुटली, नाही फुटली तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. यावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.
महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे म्हणाले की, "कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातील गोष्टी किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यामध्ये मला काही फार कठिण गोष्ट आहे असं वाटत नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे."
यासोबतच ते पुढे म्हणाले की, "हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आहे. माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाही आहे. मला वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रासाठी. माझं म्हणणं आहे की, सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी मिळून एकच पक्ष काढावा." असे राज ठाकरे म्हणाले.