उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...
मुंबई लोकसभा शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी यामिनी जाधव यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यामिनी जाधव म्हणाल्या की, खूप आनंद होत आहे. जो विश्वास माझ्यावर दाखवला गेलाय या विभागावर दाखवला गेला आहे. मला उमेदवारी दिलेली आहे. या विश्वासाला आम्ही सगळे खरे उतरु. सगळे महायुतीचे घटक मिळून आम्ही विश्वासाला खरे उतरु. विरोधक आहे ते टीका करणार त्यांचे काम आहे टीका करणे.
यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, मी सगळ्यांना स्वत: जाऊन भेटलेली आहे. त्यामुळे कुठलीही नाराजी नाही आहे. धनुष्यबाण विरुद्ध मशाल असेल. मशाल विरुद्ध धनुष्यबाण नाही आहे. अधिकृतरित्या धनुष्यबाण शिवसेनेकडे आहे. शिवसैनिक भावनिक असले तरी विचारवंत आहेत. विचार करतात. सर्व चित्र शिवसैनिकांच्या समोर आहे. निवडणूक म्हणजे दुश्मनी नसते. निवडणूक संपल्यानंतर आपण एकमेकांच्या समोर आलो तर एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघून बोलता आलं पाहिजे. या पद्धतीने निवडणूक लढावी. टीका करताना किती पातळीवर आपण गेलं पाहिजे. ती पातळी आपण आपली ठरवली पाहिजे.
माझ्या आईवर जितकं माझं प्रेम आहे तितकं माझं मुंबईवर प्रेम आहे. मुंबईची सर्वात महत्वाची उमेदवारी मला मिळालेली आहे. भारताचे लक्ष लागलेलं आहे. या विभागात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला आवाज फोडला जाईल. एवढे मी नक्की सांगेन. असे यामिनी जाधव म्हणाल्या.