Murud Janjira Fort : अखेर पर्यटकांची प्रतीक्षा संपली! जंजिरा किल्ल्याचे दरवाजे लवकरचं पुन्हा उघडणार; मात्र...

Murud Janjira Fort : अखेर पर्यटकांची प्रतीक्षा संपली! जंजिरा किल्ल्याचे दरवाजे लवकरचं पुन्हा उघडणार; मात्र...

मुरुड तालुक्यातील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला यंदाही समुद्र खवळलेला असल्याने बंद ठेवण्यात आला होता. मात्र, आता पाऊस मंदावल्याने किल्ला लवकरचं पर्यटकांसाठी पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

मुरुड तालुक्यातील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला पावसाळी हंगामात सुरक्षेच्या कारणास्तव दरवर्षी बंद ठेवला जातो. यंदाही 1जून ते 31 ऑगस्ट या कालावधीत समुद्र खवळलेला असल्याने किल्ल्याकडे जाणारी प्रवासी वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र, आता पावसाचे प्रमाण कमी झाले असून वाऱ्याचा वेगही मंदावल्याने किल्ला सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पर्यटकांसाठी पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

किल्ला पुन्हा खुला करण्यासाठी पुरातत्त्व खात्याने साफसफाई व डागडुजीची कामे हाती घेतली आहेत. राजपुरी प्रवासी वाहतूक सोसायटीकडून यंदाही बोटव्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असली तरी, साफसफाईसाठी आवश्यक मजुरांची कमतरता जाणवत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कामगार उपलब्ध न झाल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरीही, 10 ते 15 दिवसांत आवश्यक कामे पूर्ण करून किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याचा खात्याचा प्रयत्न असल्याचे सहाय्यक संवर्धक बी. जी. येलीकर यांनी स्पष्ट केले.

दरवर्षीप्रमाणे किल्ला बंद राहिल्याने स्थानिक बोटचालक व पर्यटनाशी संबंधित व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. राजपुरीतील शिडाच्या व इंजिन होड्यांवर अवलंबून असणाऱ्या 150 ते 200 कुटुंबांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे किल्ला लवकर खुला व्हावा, अशी स्थानिकांसह पर्यटकांची मागणी आहे.

जंजिरा किल्ला सुरू झाल्यानंतर पर्यटन व्यवसायाला पुन्हा गती मिळेल, स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल आणि परिसरात व्यापारी हालचालींना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पुरातत्त्व खात्याच्या हालचालींमुळे हा किल्ला सप्टेंबरच्या अखेरीस पर्यटकांसाठी खुला होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com