बाबासाहेबांच्या विचारांचा जागर, काय सांगतात बाबासाहेबांचे विचार ?
आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. कोरोनामुळे चैत्यभूमीवर जाऊन त्यांना अभिवादन करणं अवघड असलं तरी त्यांच्या विचारांचं समरण करून ते विचार प्रत्यक्ष आचरणात आणले तरी त्यांनी दाखवलेल्या उज्ज्वल भवितव्याच्या मार्गावरून वाटचाल करणं सहज सोपं होईल.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सामाजिक, धार्मिक आणि नैतिक तत्त्वांवर आधारलेले आहेत. शोषक आणि शोषित हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू आहे. सर्वांना स्वातंत्र्य, समता आणि न्याय मिळावा, हाच त्यांच्या वैचारिक मांडणीचा प्रमुख हेतू आहे.
आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे निधन झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला दादर येथील राजगृहावर आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. नंतर काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आला.
निधनापूर्वी आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक 'बोधिसत्व' मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरु होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. सर्व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. या दिवशी जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे, घरात, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात.