गणेश चतुर्थी स्पेशल: पुण्यातील मानाच्या पाच गणपतींविषयी जाणून घ्या...
कोरोनाच्या तब्बल दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. जिकडे तिकडे मोठ्या गणपतींचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. टिळकांनी पुण्यातूनच या सार्वजनिक उत्सवाला सुरुवात केली.यामध्ये मानाचे पाच गणपती, दगडूशेठ, मंडई, बाबूगेनू असे नवसाला पावणारे गणपती यांना विशेष मानले जाते.
पहिला – कसबा गणपती
कसबा गणपती हा पुण्याचं ग्रामदैवत म्हणून ओळखला जातो. कसबा पेठेत असणारा हा गणपती पेशवेकालीन असून त्याचे मंदिर शनिवारवाड्याच्या जवळ शहराच्या मध्यवस्तीत आहे. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून ती साडेतीन फूट उंचीची आहे. आधी ती खूप लहान होती. मात्र, शेंदूर लेपून ती मोठी करण्यात आली आहे. हे मंदिर शिवाजीच्या काळातील आहे, असे म्हटले जाते. १६३६ मध्ये शहाजी राजांनी लालमहाल बांधला त्यावेळी त्याच्याच बाजूला जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचे दर्शन घेऊन जात असत. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १८९३ साली सुरुवात झाली.
दुसरा – तांबडी जोगेश्वरी
बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. हे मंदिर कसबा गणपतीच्या जवळ आणि अगदी मध्यवस्तीत आहे. पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते. मानाच्या गणपतींचे आणि पुण्यातील इतरही मोठ्या गणपतींचे दरवर्षी विसर्जन करण्याची पद्धत नाही. मात्र या गणपतीच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते आणि त्यानंतर दरवर्षी नव्या मूर्तीची स्थापना होते.
तिसरा- गुरुजी तालिम गणपती
एका तालमीमध्ये हा गणपती बसविण्यास सुरुवात झाली. भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला. आता तालीम अस्तित्वात नाही. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. या गणेशोत्सवाला १८८७ मध्ये म्हणजेच सार्वजनिक गणेशोत्सव सुरु होण्याच्या आधीच सुरुवात झाली.
चौथा – तुळशीबाग गणपती
तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती उंचच्या उंच मूर्तीसाठी ओळखला जातो. तुळशीबाग या खरेदीच्या ठिकाणी मध्यभागी याची स्थापना होते. दक्षित तुळशीबागवाले यांनी १९०० साली या गणेशोत्सवाची सुरुवात केली. तुळशीबाग गणेश मंडळाची मूर्ती फायबरची आहे.
पाचवा – केसरी वाडा गणपती
केसरी या लोकमान्य टिळकांच्या संस्थेचा हा गणेशोत्सव १८९४ पासून सुरु झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने इथं होत असत.