India vs Pakistan Asia Cup Final : 'या' तारखेला भारत-पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना रंगणार
थोडक्यात
आशिया कपच्या सुपर-4 फेरीतील पाचव्या सामन्यात बांगलादेशचा 11 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक
28 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात विजेतेपदाची निर्णायक लढत रंगणार
41 वर्षांनंतर पहिल्यांदाच IND vs PAK संघ फायनलमध्ये भिडणार
(India vs Pakistan Asia Cup Final) आशिया कपच्या सुपर-4 फेरीतील पाचव्या सामन्यात पाकिस्ताननं बांगलादेशचा 11 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विजयासह 28 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात विजेतेपदाची निर्णायक लढत रंगणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत तिसऱ्यांदा दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत.
नाणेफेक जिंकून बांगलादेशचा कर्णधार झाकेर अलीनं पाकिस्तानला प्रथम फलंदाजीस बोलावलं. मात्र, पाकिस्तानी फलंदाजांची सुरुवात निराशाजनक ठरली. केवळ 5 धावांवर दोन्ही सलामीवीर बाद झाले. त्यानंतर संघाने कसाबसा डाव सावरण्याचा प्रयत्न केला आणि 20 षटकांत 8 गडी गमावून 135 धावा उभारल्या. मोहम्मद हॅरीसनं सर्वाधिक 31 धावा केल्या, तर नवाज (25), शाहीन आफ्रिदी (19) आणि सलमान आघा (19) यांनी थोडीफार साथ दिली. गोलंदाजीत बांगलादेशकडून तस्किन अहमदनं 3, तर मेहंदी हसन आणि रीशद हुसेन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवातही खराब झाली. पहिल्याच षटकात एक गडी गमावल्यानंतर संघाला मोठी भागीदारी साधता आली नाही. विकेट्स नियमित अंतराने पडत राहिल्याने त्यांचा डाव 124 धावांवर संपला. शमीम हुसेननं 30 धावांची लढतीवजा खेळी केली, तर सैफ हसन (15) आणि नरुल हसन (16) यांनी थोडीशी मदत केली. परंतु, मोठी खेळी कोणीच करू शकला नाही. पाकिस्तानसाठी शाहीन आफ्रिदी आणि हरीस रौफ यांनी प्रत्येकी 3 बळी घेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
या विजयामुळे पाकिस्तानचं अंतिम फेरीत स्थान निश्चित झालं असून आता भारताविरुद्धची रंगतदार टक्कर पाहायला मिळणार आहे. याआधी या स्पर्धेत झालेल्या दोन सामन्यांत भारतानं सहज विजय मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं. त्यामुळे रविवारी होणारा हा अंतिम सामना आशियाच्या क्रिकेटचा नवा बादशाह ठरवणार आहे.भारत- पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याचा थरार दुबईतील दुबई क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये रंगणार आहे.