Pahalgam Terrorist Attack : पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट, भारतीय क्रिकेटर्सकडून तीव्र निषेध
काल जम्मू-काश्मीर पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर संपुर्ण देशभरात सामूहिक दुःखाचे उदास वातावरण जाणवत आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला असून भारतातून संतापाची लाट व्यक्त केली जात आहे. सध्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची हृदय पिळवटणारी दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेटर्सने देखील यासंबंधी हळहळ व्यक्त केली आहे. या प्राणघातक हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना भारतीय क्रिकेटर्सकडून श्रद्धांजली वाहण्यासाठी सोशल मीडियावर स्टोरी शेअर केली आहे. यादरम्यान हार्दिक पांड्या, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, कुलदीप यादव, सुर्यकुमार यादव, युजवेंद्र चहल, तिलक वर्मा या खेळाडूंनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याबाबत स्टोरी ठेवत निषेध व्यक्त केला आहे.
भारतीय क्रिकेटर्सकडून पहलगाममधील हल्ल्यावर निषेध व्यक्त
सचिन तेंडुलकर- "पहलगाममधील निष्पाप लोकांवर झालेल्या दुःखद हल्ल्यांमुळे धक्का बसला आहे आणि खूप दुःख झाले आहे. पीडित कुटुंबे एका अकल्पनीय संकटातून जात असतील. या काळ्या काळात भारत आणि जग त्यांच्यासोबत एकजुटीने उभं आहे, कारण आम्ही जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करतो आणि न्यायासाठी प्रार्थना करतो".
विराट कोहली- "पहलगाममध्ये निष्पाप लोकांवर झालेल्या भयानक हल्ल्याने खूप दुःख झाले आहे. पीडितांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना. ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांना शांती आणि शक्ती मिळावी आणि न्याय मिळावा अशी प्रार्थना करतो".
हार्दिक पांड्या- "पहलगाममधील बातमीने मला खूप दुःख झाले. माझ्या संवेदना बाधित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत".
कुलदीप यादव- "पहलगाममधील हल्ल्याने धक्का बसला आणि दुःख झाले. माझ्या संवेदना पीडितांसोबत आणि त्यांच्या प्रियजनांसोबत आहेत. काश्मीर ही शांतीची भूमी आहे. तिथे दहशतवादाला कोणतेही स्थान नाही. चला आपण एकत्र आणि मजबूत उभे राहूया".
युजवेंद्र चहल- "पहलगाममधील दुर्घटनेने आमचे मन दुखावले आहे. आमच्या संवेदना पीडितांसोबत आणि त्यांच्या प्रियजनांसोबत आहेत. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत आणि आमच्या तीव्र सहानुभूती व्यक्त करतो".
तिलक वर्मा- "पहलगाम हल्ल्यातील बळींसाठी प्रार्थना. त्यांना शांती लाभो".
सुर्यकुमार यादव- "पहलगाममधील भ्याड हल्ल्याच्या बातमीने धक्का बसला. आपण सर्वजण दहशतवादाविरुद्ध एकत्र उभे राहूया आणि पीडितांच्या कुटुंबियांना शक्ती आणि न्याय मिळावा यासाठी प्रार्थना करूया".
काल पहलगाममध्ये दहशदवाद्यांकडून धर्म विचारुन हल्ला
काल जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी नावे विचारून हिंदू नाव समोर आल्याबरोबर अंदाधुंद गोळीबार सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात अनेक पर्यटकांसह अनेक स्थानिक नागरिकही जखमी झाले आहेत. यावेळी हल्ला करणारे दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात आले असून दोन ते तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर 50 हून अधिक वेळा गोळीबार केला. तसेच या दहशतवादी हल्ल्यात 28 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. ते पोलिसांच्या वेशात आल्यामुळे, स्थानिक लोकांसह पर्यटकांनाही ते दहशतवादी असू शकतात असा कोणताच अंदाज आला नाही. या हल्ल्याची जबाबदारी TRFने स्वीकारली आहे.