Asia Cup 2025 IND vs PAK Final : “भारताला दाखवून द्या की...” फायनलपूर्वी पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं वादग्रस्त वक्तव्य
आशिया कप 2025 मध्ये पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध अंतिम फेरीत भिडणार आहेत. या ऐतिहासिक सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पुन्हा एकदा आपल्या आक्रमक शैलीसाठी चर्चेत आला आहे. अख्तरने पाकिस्तानच्या खेळाडूंना संदेश दिला आहे की त्यांनी मैदानावर उतरताना “मारण्याच्या इराद्याने खेळा”.
हा सामना 28 सप्टेंबर रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ सर्व सामने जिंकत फाइनलमध्ये पोहचला आहे, तर पाकिस्तानने संघर्ष करत अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेत हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा एकमेकांसमोर येणार आहेत.
याआधी ग्रुप स्टेज आणि सुपर-4 मध्ये झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला दणदणीत पराभव दिला होता. तरीदेखील अख्तरचा दावा आहे की फाइनलमध्ये पाकिस्तानी संघाने वेगळ्या जोशात उतरून भारताचा अहंकार मोडून काढायला हवा. त्याने खेळाडूंना सल्ला दिला की, “भारताला दाखवून द्या की तुम्ही कसे आहात आणि त्यांना कायम दबावाखाली ठेवा.”
अख्तरच्या या वक्तव्यामुळे फाइनल सामन्याविषयीचं वातावरण आणखी तापलं आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंवर या संदेशाचा किती परिणाम होतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल, मात्र चाहत्यांमध्ये यामुळे थ्रिल निश्चितच वाढला आहे.
विशेष म्हणजे, एशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यात भिडत आहेत. त्यामुळे हा सामना केवळ स्पर्धेच्या दृष्टीनेच नाही, तर क्रिकेट प्रेमींसाठीही ऐतिहासिक ठरणार आहे.