स्टंप तोडणे आणि अंपायरशी वाद भोवला! हरमनप्रीत कौरवर आयसीसीची मोठी कारवाई
नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकतीच बांगलादेश दौऱ्यावर तीन एकदिवसीय मालिका खेळली. ही मालिका रोमांचक आणि वादग्रस्तही ठरली आहे. ही मालिकाही बरोबरीत सुटली. पण, तिसरा एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने रागाने स्टंपला मारले आणि पंचाशी वाद घातला. याप्रकरणी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) हरमनप्रीतवर मोठी कारवाई केली आहे.
आयसीसीने भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीतवर पुढील दोन सामन्यांसाठी बंदी घातली आहे. म्हणजेच आता हरमनप्रीत पुढील दोन सामने खेळू शकणार नाही. याप्रकरणासाठी हरमनप्रीतला मॅच फीच्या 50 टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे. यासोबतच त्याला ३ डिमेरिट गुणही मिळाले आहेत. हरमनप्रीतने आपला गुन्हा मान्य केला आहे. यामुळेच आयसीसीने या प्रकरणी सुनावणी न घेता हा निर्णय दिला.
आयसीसीच्या 2016 पासूनच्या यादीनुसार, 29 महिला क्रिकेटपटूंनी आतापर्यंत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळल्या आहेत. हरमनप्रीतशिवाय वेदा कृष्णमूर्ती दोनदा दोषी ठरली आहे. हरमनप्रीतने शेवटच्या वेळी 2017 च्या विश्वचषक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध डिमेरिट पॉइंट मिळवला होता.
नेमके काय आहे प्रकरण?
तिसऱ्या वनडेत बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करताना 225 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची फलंदाजीची सुरुवात खास नसली तरी संघ स्थिर होता. मात्र 34व्या षटकात हरमनप्रीतच्या रूपाने संघाला चौथा मोठा धक्का बसला. 34व्या षटकातील नाहिदा अख्तरच्या चेंडूवर अंपायरने हरमनप्रीतला एलबीडब्ल्यू बाद घोषित केले. यानंतर हरमनप्रीत कौर भडकल्याची दिसून आली. यावेळी तिने अंपायरच्या चुकीच्या निर्णयावरून स्टंपवर बॅट फेकून मारत अंपायरशी हुज्जत घालत संताप व्यक्त केला.