India vs England
India vs England

IND vs ENG,T20-World Cup 2024: दुसऱ्या सेमीफायनल सामन्यासाठी राखीव दिवस का नाही? जाणून घ्या यामागचं कारण

क्रिकेटप्रेमींच्या नजरा भारत-इंग्लंड यांच्यात होणाऱ्या सेमीफायनलवर लागल्या आहेत. हा सामना गयानाच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Ind vs Eng Semifinal Match Does Not Have Reserve Day : टी-२० वर्ल्डकपचा पहिला सेमीफायनलचा सामना दक्षिण आफ्रिकेनं अफगानिस्तानविरोधात जिंकला आहे. एडन मार्करमच्या कॅप्टन्सीत पहिल्यांदाच आफ्रिकेनं वर्ल्डकपच्या फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. या सामन्यानंतर आता क्रिकेटप्रेमींच्या नजरा भारत-इंग्लंड यांच्यात होणाऱ्या सेमीफायनलवर लागल्या आहेत. हा सामना गयानाच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून गयानात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे हा सामना होणार की नाही? असा प्रश्न तमाम क्रिकेटप्रेमींना पडला आहे.भारत-इंग्लंड यांच्यात होणाऱ्या या सामन्यात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. अशातच आयसीसीच्या या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला नाही. परंतु, सामन्यासाठी २५० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. पण या सामन्यासाठी राखीव दिवस का नाही? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

राखीव दिवस न ठेवण्याचं मुख्य कारण

पहिल्या सेमीफायनलमध्ये आयसीसीने राखीव दिवस ठेवला होता. परंतु, हा सामना निश्चित वेळेत पूर्ण झाला. भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या सामन्यात पाऊस पडू शकतो. परंतु, सामना पूर्ण करण्यासाठी ४ तास १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला आहे. या सेमीफायनलसाठी राखीव दिवस दिला असता, तर फायनल सामन्यासाठी संघांना तयारी करण्यासाठी कमी वेळ मिळाला असता, असं कारण समोर आलं आहे. यामुळे आयसीसीने राखीव दिवस न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण दुसऱ्या सेमीफायनल आणि फायनलच्या सामन्यात फक्त एक दिवसाचं अंतर आहे. त्यामुळे दुसऱ्या सेमीफायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला नाही.

फायनल सामन्यासाठी असणार राखीव दिवस

दक्षिण आफ्रिका संघाने पहिला सेमीफायनलचा सामना जिंकला आहे आणि फायनलमध्ये स्थान पक्क केलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या सेमीफायनलच्या सामन्यात जो संघ विजेता ठरेल, तो फायनलमध्ये प्रवेश करेल. हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर भारत दक्षिण आफ्रिकेविरोधात फायनलचा सामना खेळेल. कारण भारतीय संघाने ग्रुप स्टेज आणि सुपर ८ मध्ये पहिलं स्थान पक्क केलं आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरु होईल. पण या सामन्यात पाऊस पडल्यास सामना कमी षटकांचा खेळवला जाईल. या षटकांसाठी रात्री १२.१० (AM) वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. तर रात्री १.४४ (AM) चा कट ऑफ टाईम १०-१० षटकांसाठी ठेवण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com