Devendra Fadnavis On Rohit Sharma
Devendra Fadnavis SpeechLokshahi

विधानभवनात सत्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले; "जागतिक टी-२० क्रिकेटमध्ये रोहित शर्मा..."

सूर्यकुमार यादवच्या नावातच सूर्य आहे. हा उगवता सूर्य आहे. हा मावळता सूर्य नाही, असं मोठं विधान देवेंद्र फडणवीसांनी सूर्यकुमारबाबतही केलं आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Devendra Fadnavis On Rohit Sharma : ज्यांच्या सत्कारासाठी आपण एकत्रित झालो आहोत. हा आपल्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. ज्या अपराजीत भारतीय संघाने टी-२० चा वर्ल्डकप जिंकला. त्यातील चार यशस्वी खेळाडूंचं आणि कर्णधाराचं स्वागत करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. रोहित शर्मानं एकाच दिवशी आपल्याला आनंद आणि दु:खही दिलं. आपल्याला विश्वकप जिंकून प्रचंड मोठा आनंद त्यांनी दिला. पण त्याचदिवशी टी-२० मधून निवृत्ती घोषित करून आपल्याला दु:खही दिलं. ज्यांच्याशिवाय भारताचं क्रिकेट पूर्ण होऊ शकत नाही, अशा यादीत आता रोहित शर्माचं नावही नोंदवलं गेलं आहे. कपिल देव आणि धोनीनंतर रोहित शर्मानं आपल्याला विश्वचषक जिंकवून दिलं.रोहित शर्मा जगातील टी-२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात खेळाडूंच्या सत्कार सोहळ्यात केलं.

फडणवीस पुढे म्हणाले, माझा राजकीय लोकांना सल्ला आहे, रोहित शर्मा जेव्हा पत्रकार परिषद घेतात, त्यावेळी कमीत कमी बोलून शारिरीक हावभाव दाखवूनही उत्तर देता येतं, हे रोहित शर्माकडून शिकता येईल. त्याच्या नावावर किती विक्रम आहेत, हे देखील आपल्याला माहित आहे. रोहित शर्मा जगातील टी-२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहित शर्माने ५० सामने जिंकून सर्वाधिक विजय मिळवलं आहे. रोहितच्या नावावर अनेक विक्रम आहेत. पण एक कर्णधार म्हणून रोहितने संघाचा ज्या प्रकारे विश्वास मिळवला, ते सर्वात महत्त्वाचं आहे. कठोर वागूनही संघाच्या खेळाडूंना विश्वास असला पाहिजे की, हा आमचा कर्णधार आहे. कर्णधाराच्या उत्तम परंपरेत चार चाँद लावण्याचं काम रोहित शर्मानं केलं आहे.

सूर्यकुमार यादवच्या नावातच सूर्य आहे. हा उगवता सूर्य आहे. हा मावळता सूर्य नाही. रोहित शर्माचा अनुभव खूप मोठा आहे. गोलंदाजाला रात्री झोप लागणार नाही, अशाप्रकारे फलंदाजी करणं हे या चौघांना चांगल माहितीय. हे मैदानात उतरल्यावर चौकार आणि षटकार याचा हिशोबच राहत नाही. संघ अडचणीत असताना शतक ठोकणारे खेळाडूच आपल्याला जिंकवून देऊ शकतात. सूर्यकुमारने पकडलेला झेल आपण कधीच विसरू शकत नाही. ते देखील म्हणत असतील, बरं झालं हा झेल माझ्या हातात आला.

पण हा योगायोग नव्हता. ही तुमची मेहनत होती. तुमचा सराव होता. त्यामुळे इतका कठीण झेल तुम्ही पकडू शकले. अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. मला असं वाटतं की, महाराष्ट्राला या खेळाडूंनी धन्य केलं आहे. महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही म्हणू शकतो, आम्हाला तुमचा अभिमान आहे. काल आम्ही जीव मुठीत धरून बसलो होतो. कारण इतके लोक जमा झाल्यावर ते घरी जाईपर्यंत आपली विकेट तर पडणार नाही ना? अशाप्रकारची परिस्थिती असते. मुंबई पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं. पण अपेक्षेच्या दुप्पट लोक आले. मुंबईकरांचं प्रेम काल ओसांडून वाहत होतं. पण मुंबईकरांनी शिस्त मोडली नाही म्हणून मी मुंबईकरांचेही मनापासून अभिनंदन करतो, असंही फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com