World Cup 2023: टीम इंडियाने नेदरलँडचा 160 धावांनी पराभव केला, विराट-रोहितने घेतले विकेट
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या साखळी टप्प्यातील 45 व्या आणि शेवटच्या सामन्यात नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव करून मोठा विजय नोंदवला आहे. दिवाळीच्या दिवशी टीम इंडियाने चाहत्यांना भेटवस्तू दिली आणि रोहित शर्मा आणि विराट कोहलीनेही सामन्यात विकेट घेतल्या. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यर आणि केएल राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर 410 धावा केल्या.
भारताकडून रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल यांनीही अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 250 धावा करण्यात यशस्वी ठरला. नेदरलँड्सकडून तेजा नितामानुरुने 54 धावा आणि सायब्रॅंड एंजेलब्रेक्टने 45 धावा केल्या. भारताच्या या विजयासह आयसीसी वनडे विश्वचषक 2023 चा लीग टप्पा संपला आहे. यंदाच्या विश्वचषकात टीम इंडिया अजेय राहिली आहे. भारताने सलग नवव्या विजयाची नोंद केली. अखेरच्या साखळी सामन्यानंतर भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.
भारतीय फलंदाजांनी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज फटक्यांची जणू दिवाळी साजरी केली. त्यामुळंच नेदरलँड्सविरुद्धच्या अखेरच्या विश्वचषक साखळी सामन्यात भारताला चार बाद 410 धावांचा डोंगर उभारता आला. भारतीय फलंदाजांनी या सामन्यात नेदरलँड्सच्या दुबळ्या आक्रमणाचा पुरेपूर लाभ उठवला आणि धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. भारताच्या रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली या पहिल्या तीन फलंदाजांनी या सामन्यात अर्धशतकं झळाकवली. रोहित शर्मानं 61, शुभमन गिलनं 51 आणि विराट कोहलीनं 51 धावांची खेळी केली.