Bacchu Kadu : अमरावतीत प्रहारचं चक्काजाम आंदोलन; बच्चू कडू यांचा सरकारला इशारा, म्हणाले...
Bacchu Kadu : शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहारचं आज अमरावती जिल्ह्यातील अचलपूर टोल नाक्याजवळ चक्काजाम आंदोलन सुरु आहे. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळत तीव्र निषेध व्यक्त केला.
यापूर्वी शेतकरी प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी पदयात्रा, उपोषण केल्यानंतर आजपासून थेट रस्त्यावर उतरत प्रहारने आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनात बच्चू कडू सहभागी असून बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “जोपर्यंत कर्जमाफीची तारीख जाहीर होत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही.
न मागता तुम्ही बाकीच्या योजना सुरु करता, शक्तीपीठ सुरु करता, उद्योगपतींसाठी तुमच्याकडे पैसा आहे , पण शेतकऱ्यांसाठी, मेंढपाळांसाठी, मच्छिमारांसाठी, दिव्यांगांसाठी पैसे नाही आहेत. गरजेच्या योजना सुरू होत नाहीत. कुठल्याही क्षणी आम्ही मंत्रालयात घुसू. तारीख न सांगता. सरकारने कर्जमाफीची तारीख सांगावी.
मेंढपाळांचे प्रश्न, शेतमजुरांचा प्रश्न असेल, दिव्यांगांचा प्रश्न असेल यावर जर निर्णय घेतलं नाही तर कुठल्याही क्षणी आम्ही मंत्रालयात घुसू. समिती नेमायची पण तारीख सांगायची नाही. उपोषण केलं सरकार जागेवर येत नाही, आठ दिवस पायदळी चाललो सरकार काम करत नाही. मग आता काय केलं पाहिजे?