Borivali West: बोरीवली वेस्टमधील RMC प्लांटमुळे नागरिक त्रस्त, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम पायदळी तुडवल्याचा आरोप
मुंबईच्या बोरिवली पश्चिमेतील एम. जी. रोडवरील पार्थ शाळेजवळ गेल्या वर्षभरापासून चालू असलेल्या RMC प्लांटमुळे परिसरातील हजारो नागरिक आणि विद्यार्थी हैराण झाले आहेत. धीरज रेसिडेन्सी, शिवशक्ती नगर, एस. आर. सुरभी, कृष्ण सोसायटी, माधवकुंज, रिद्धी-सिद्धी, हर्षाली नरवणे शाळा आणि पार्थ रुग्णालय परिसरातील रहिवाशांना प्रचंड धूळ, गोंगाट आणि अवजड वाहनांच्या वर्दळीचा त्रास होत आहे.
जवळच शाळा आणि रुग्णालय असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अपघाताचा धोका वाढला असून, नागरिकांनी अनेकदा तक्रारी नोंदवल्या तरी प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
परिसरातील रहिवासी म्हणतात की, रोज सकाळी आणि संध्याकाळी अवजड ट्रकांच्या वर्दळीमुळे रस्ते खराब झाले असून, धूळमुळे श्वासोच्छ्वासाच्या समस्या वाढल्या आहेत. शाळकरी मुलांना बाहेर खेळताना धोका वाटतोय. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून प्लांट बंद करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
