Mangesh Sable: सरपंच मंगेश साबळेंचं अनोखं आंदोलन, साडी नेसून जिल्हा परिषदेत तक्रार
संभाजीनगरच्या गेवराई पायगामधील सरपंच मंगेश साबळेंनी अजब आंदोलन केलंय. साडी घालून सरपंचाने थेट जिल्हा परिषदेत तक्रार केली आहे. गावातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने गावचे सरपंच साडी घालून जिल्हा परिषदेमध्ये तक्रार घेऊन गेले.
छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई तालुक्यातील पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे एकदा पुन्हा आक्रमक पवित्रा घेत असल्याचं पाहायला मिळालं. पाणी प्रश्नावर त्यांनी अनोख्या आंदोलनाची शैली कायम ठेवत जिल्हा परिषदेत साडी नेसून धडक दिली आहे. आपण दोन अडीच वर्षे सरपंच असताना त्यांच्या गावातील पाणी प्रश्न समाधानकारक पद्धतीने सुटलेला नाही. ठेकेदारांनी त्यांचं काम केलं नसल्याने आपण निवदेन देण्यास आलो असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले सरपंच मंगेश साबळे?
मंगेश साबळे यांची आक्रमक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली की, "आज मी सरपंच म्हणून नाही, तर गावातील महिलांच्या समस्यांचा आवाज म्हणून इथे आले आहे. महिलांना दोन किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावं लागतं. आमच्या गावात प्यायचं पाणी नाही. सुरुवातीला स्वच्छ पाणी मिळवण्यासाठी मी विहिरीत बसून आंदोलन केलं. त्याच महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच होऊन दोन अडीच वर्षे झाली. ४ वर्षे झाली जलजीवन मिशनचं काम पूर्ण होत नाही." अशी खंत मंगेश साबळे यांनी व्यक्त केली.
तसेच, त्यांनी जलजीवन योजनेची स्थिती स्पष्ट करत सांगितलं की, "पाईप आणले, पाईप रोडमध्ये दाबले, पाईपलाइन सडायला लागली, पण त्यातलं पाणी अजून आलेलं नाही. चार वर्षे झाले जल जीवन मिशनचं उद्घाटन झालं. एक कोटी ८० लाख रुपयांचं इस्टिमेट तयार केलं. कुठे काम अडकलंय? कुठे घोडा पेंड खातंय, का जल जीवन मिशनच्या एक एक कामाला ४-४ वर्षे लागतायत असं म्हणत साबळे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. पूर्ण तालुक्यात, पूर्ण जिल्ह्यात ही अवस्था आहे. माझ्या गावातील महिलांच्या माध्यमातून त्यांचा आकांत पोहचवण्यासाठी मी आलो आहे.
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही म्हणता माझी लाडकी बहिण आहे. तुमच्या लाडक्या बहिणीला प्यायला पाणी मिळेना. अधिकारी लक्ष देईना, त्यांनी टक्केवारी घेतलीय की काय असं वाटायला लागलंय. माझ्या गावातल्या महिला विचारतात भाऊ तुला सरपंच केलं अजून पाणी आणलं नाही. अजून जल जीवन मिशनचं काम पूर्ण झालं नाही.
मंगेश साबळे यांची अनोखी आंदोलनं
मंगेश साबळे यांनी फुलंब्री पंचायत समोर पैशांची उधळणी करत आंदोलन केले होते. शेतकऱ्यांच्या विहिरींसाठी लाच घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच, गावातील वीज समस्या सोडवण्यासाठी महावितरण कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलनही केले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी कार जाळून आपला विरोध दर्शविला होता, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.