धरणातून होणाऱ्या गळती विरोधात कोल्हापुरात शिवसेना UBT पक्षाचंं आंदोलन
कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी दूधगंगा धरणातून होणाऱ्या पाण्याच्या गळती विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला. शासनाने तातडीने धरणातून होणाऱ्या पाण्याच्या गळती संदर्भात कार्यवाही करावी आणि धरणातून होणारी पाण्याची गळती थांबवावी अन्यथा 3 जूनला धरणात उतरुन जलसमाधी घेण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.
याबाबत निवेदन शिष्टमंडळाने पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांना दिलं आहे. यावेळी आंदोलकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून चांगलच धारेवर धरलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दूधगंगा धरणातून मोठ्याप्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने धरणाला धोका पोहचण्याची शक्यता भासवत असल्यामुळे गळती काढण्यासाठी राज्य शासनाने पाटबंधारे विभागाला मुबलक निधी उपलब्ध करून दिलेला आहे. मात्र गळती काढण्याच काम अद्यापही सुरू झालेलं नाही.
त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या क्षमतेने होत आहे. त्यातच पाण्याच्या गळतीमुळे पाटबंधारे विभागाने यंदा शेतकऱ्यांना ऊसाची लागण करु नये अशा सूचना दिल्या होत्या. मात्र धरणाच्या गळतीच्या कामांचा बोजवारा उडाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाटबंधारे विभाग जुजबी कारवाई करतं मात्र यावर कायमस्वरूपी उपाययोजना होत नाही. त्यामुळे आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांसह शासनाला आठ दिवसाचा अल्टिमेट देण्यात आला आहे.