Kolhapur Rain : कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात अतिवृष्टी; राजाराम बंधाऱ्यासह 56 बंधारे पाण्याखाली
(Kolhapur Rain ) कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. पंचगंगा, दूधगंगा, कुंभी, कासारी, वारणा वेदगंगा, घटप्रभा, भोगावती, ताम्रपर्णी सह जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणात अधिकचा साठा असल्याने भविष्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेता धरणातून अद्यापही विसर्ग सुरूच असल्याची माहिती मिळत असून पंचगंगेची पाणीपातळी 33 फुट 7 इंचांवर गेली आहे. गेल्यावर्षी याच दिवशी राधानगरी धरणात 27 % पाणी साठा होता तर आज राधानगरी धरण 65 % पाणी साठा आहे.
राजारामसह 56 बंधारे पाण्याखाली गेली असून वाहतूक विस्कळीत झाली आहे मात्र पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.