थोडक्यात
मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघरला रेड अलर्ट
आज मुंबईत मुसळधार पाऊस पडणार
अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन
(Rain Update) महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. यातच आता २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सर्व जिल्हा प्रशासनांना संभाव्य अतिवृष्टीच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या आहेत.
मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून
मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघरला रेड अलर्ट देण्यात आला असून आज मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असून सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर पालिका आणि प्रशासनाकडून यंत्रणाना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असे पालिकेचे आवाहन केले असून आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.