ऐन कोरोना काळात हरिद्वारमध्ये पार पडलेल्या कुंभमेळ्यात कोरोना चाचण्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
उत्तराखंड आरोग्य विभागाने हरिद्धारमध्ये कुंभमेळ्यादरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी चार लाख चाचणी अहवाल बनावट असल्याचा संशय व्यक्त केला होता. यानंतर करण्यात आलेल्या तपासात एकूण १ लाख चाचणी अहवाल बनावट असून खासगी एनज्सीच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
एका प्रकरणात तर एकाच फोन क्रमांकावरुन ५० जणांचं रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं असून एकच अँटिजन टेस्ट किट ७०० चाचण्यांसाठी वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. "पत्ते आणि नावं काल्पनिक आहेत. हरिद्वारमधील 'घर क्रमांक ५' मधून ५३० नमुने घेण्यात आले आहेत. एकाच घऱात ५०० लोक राहत असणं शक्य तरी आहे का? काहीजणांनी तर मनाप्रमाणे पत्ते टाकले आहेत. घर क्रमांक ५६, अलिगड; घर क्रमांक ७६, मुंबई असे पत्ते लिहिले आहेत", अशी माहिती तपासात सहभागी एका अधिकाऱ्याने दिली आहे. यासंदर्भात 'टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
कोरोना काळात कुंभमेळा भरवल्याने सरकारवर टीका झाली होती. मात्र कुंभमेळा घेण्यावर सरकार ठाम राहिल्याने अखेर अनेकांना यामुळे कोरोनाची बाधा झाली होती. अनेक साधूंची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने अखेर कुंभमेळ्याची सांगता लवकर करण्यात आली.