पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकार एक्शन मोडवर आल्याच पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक संपन्न झाली. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत भारत सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीत पाकिस्तानविरुद्ध 5 कठोर निर्णय घेण्यात आले.
तर आज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि गृहमंत्री अमित शहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटण्यासाठी पोहोचले. एवढंच नव्हे तर आज गुरुवारी, संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक झाली. ज्यामध्ये राहुल गांधींसह अनेक विरोधी नेते सहभागी होते. ही बैठक सुरु होण्याआधी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सुरू असलेल्या सर्वपक्षीय बैठकीत 2 मिनिटे मौन पाळत सर्व नेत्यांनी जीव गमावलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला.
सुरक्षा परिस्थितीचे गांभीर्य आणि भविष्यातील रणनीतींवरील चर्चेच्या दृष्टीने ही उच्चस्तरीय बैठक महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान या बैठकीतून बाहेर पडताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, सरकारच्या प्रत्येक कृतीला आणि प्रत्येक कारवाईवर पूर्ण पाठिंबा आहे. तसेच या सर्वपक्षीय बैठकीला AIMIMला आमंत्रण न मिळाल्यानं ओवैसींनी संताप व्यक्त केला. बैठकीत 5 ते 10 खासदार असलेल्या पक्षांनाच निमंत्रण दिल्याचा ओवैसींनी दावा केला. तर आमच्यासारख्या लहान पक्षांनाही भूमिका मांडण्याचा अधिकार असल्याचं ओवैसींनी म्हटलं आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक महाराष्ट्रात सुखरुप परतले
या दहशदवादी हल्ल्यादरम्यान महाराष्ट्रातून काही पर्यटकांचा मृत्यू झाला तर काही पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये अडकले होते. याच पर्यटकांना Akj6907 या स्पेशल विमानाने मुंबई विमानतळावर सुखरुप पोहचवण्यात आले आहे. या विमानाने येणारे प्रवासी हे पुणे येथील असून काही पर्यटक मुंबई ठाणे येथे राहणारे आहेत. पुण्याच्या पर्यटकंसाठी मुंबईहुन पुण्याला जाण्यासाठी विशेष एसी बसचे आयोजन करण्यात आले आहे.