राजधानी दिल्लीमध्ये सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. अगदी तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची धामधून सध्या दिल्लीत पाहायला मिळत आहे. दिल्लीत सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाने विजयी हॅटट्रिक करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. आम आदमी पक्षाचे संस्थापक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी तुरुंगाची वारी करावी लागली. त्यामुळे 'आप'ने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. दुसरीकडे देशाच्या राजधानीची सत्ता मिळवण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसकडूनही जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी आज पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली निवडणुकीसाठी काँग्रेसने भाजपासोबत हातमिळवणी केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच काँग्रेस नेत्यांवर अॅक्शन न घेतल्यास 'इंडिया' आघाडीसोबत राहण्याबाबत विचार केला जाईल असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
काय म्हणाल्या आतिशी?
काँग्रेसचे नेते अजय माकेन यांनी वक्तव्य केलं की अरविंद केजरीवाल अॅण्टी नॅशनल आहेत. मात्र, आपण काँग्रेसला विचारू इच्छितो की, तुम्ही आतापर्यंत भाजपच्या कोणत्याही नेत्यावर असा आरोप केला आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेस पक्षाने अरविंद केजरीवाल आणि माझ्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. मात्र, भाजपविरोधात काँग्रेसने आतापर्यंत अशाप्रकारची एकही एफआयआर नोंदवलेला नाही.
काँग्रेसच्या उमेदवारांचा निवडणुकीचा खर्च भाजप करत असल्याची माहिती त्यांना अधिकृत सुत्रांनी दिली आहे. यामध्ये प्रमुख हे संदीप दीक्षित आणि फरहाद सुरी आहेत. ज्यांना भाजपकडून कोट्यवधींची फंडिंग केली जात आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीर करावं की संदीप दीक्षित आणि फरहाद सुरी यांना फंडिंग कोण करतंय हे जाहीर करावं.
काँग्रेस दिल्लीमध्ये भाजपकडून निवडणूक का लढवून घेत आहे असा सवाल त्यांनी काँग्रेसला विचारला आहे. केजरीवाल यांना जर अॅण्टी नॅशनल ठरवायचं होतं तर त्यांच्याकडून काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत प्रचार का करवून घेतला, असा सवालही आतिशी यांनी विचारला आहे.
काँग्रेसला थेट इशारा: आम आदमी पक्षाला हरवून भाजपला जिंकवण्यासाठी काँग्रेसने हातमिळवणी केली असल्याचं त्या म्हणाल्या. जर यामध्ये तथ्य नसल्यास काँग्रेसने २४ तासांत अजय माकेन यांच्याविरोधात अॅक्शन घ्यावी. आपल्यावर आणि केजरीवाल यांच्यावर एफआयर दाखल केल्याप्रकरणी युथ काँग्रेसच्या नेत्यांवर अॅक्शन घ्यावी. काँग्रेसने नेत्यांवर अॅक्शन न घेतल्यास 'इंडिया' आघाडीसोबत राहण्याबाबत विचार केला जाईल.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-