12 जून रोजी अहमदाबादमध्ये टेकऑफनंतर काही क्षणांतच एअर इंडियाचे बोईंग 787-8 हे विमान कोसळले होते. या दुर्घटनेबाबत विमान अपघात तपास संस्थेने (AAIB) प्राथमिक तपशील समोर आणले असून, त्यात अनेक आश्चर्यकारक बाबी उघडकीस आल्या आहेत.
अहवालानुसार, विमानाने नेहमीप्रमाणे उड्डाण केले होते आणि आवश्यक उंचीपर्यंत पोहोचले होते. मात्र, अचानक दोन्ही इंजिनना इंधन पुरवठा थांबला आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता बंद पडली. हे इंजिन फ्युएल कटऑफ स्विच ‘रन’ मोडमधून ‘कटऑफ’ मोडमध्ये गेल्यामुळे घडले, ज्यामुळे इंजिनना इंधन मिळणे थांबले आणि त्यामुळे विमान कोसळले.
पायलट्समधील संभाषणातून मिळाले महत्वाचे संकेत
कॉकपिटमधील रेकॉर्डिंगनुसार पायलट सुमीत सभरवाल आणि सह-पायलट क्लाइव्ह कुंदर यांच्यातील संवादातून स्पष्ट होते की, इंजिन बंद होण्यामागे कोणत्याही पायलटचा थेट सहभाग नव्हता. संभाषणात एक पायलट विचारतो, “तू स्विच का बंद केलास?” आणि दुसरा उत्तर देतो, “मी काही केलं नाही.” यावरून यंत्रणेमध्ये काही तांत्रिक त्रुटी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इंजिन बंद झाल्यानंतर तातडीने रॅम एअर टर्बाइन (RAT) कार्यान्वित झाली, जी अशा आपत्कालीन परिस्थितीत अतिरिक्त उर्जा पुरवते. तांत्रिक पद्धतीने इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. विमान आवश्यक उंची गाठू शकले नाही आणि रनवेच्या पुढील भिंतीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच कोसळले. सध्या या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे आणि यामागचे नेमके तांत्रिक कारण शोधण्याचे काम अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.