जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील संशयित दहशतवाद्यांची दोन महिने आधी जाहीर करण्यात आलेले स्केच आता चुकीचे ठरवले असून, यावरून शिवसेनेच्या 'सामना' दैनिकातून केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका करण्यात आली आहे.
'सामना'ने आजच्या अग्रलेखात विचारले आहे की, एवढ्या गंभीर घटनेनंतरही चुकीचे स्केच कसे तयार झाले? आणि ते जगभर कसे झळकवले गेले? ही केवळ सरकारची नाही, तर संपूर्ण देशाची नाचक्की असल्याचे 'सामना'ने म्हटले आहे. पहलगाम हल्ल्यातील खरे तीन पाकिस्तानी दहशतवादी वेगळे असल्याचा एनआयएचा ताजा खुलासा धक्कादायक असल्याचे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
सामना लेखात अधिक पुढे म्हटले आहे की, “ही चूक कोणामुळे झाली, याचा तपास झाला पाहिजे. यंत्रणांकडून हेतुपुरस्सर दिशाभूल केली गेली का? हल्ल्याच्या तपासात इतकी बेपर्वाई का दाखवली गेली?” असे प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या चुकीच्या स्केचमुळे केवळ तपासच दिशा भरकटला नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा देखील मलीन झाल्याचे 'सामना'तून व्यक्त करण्यात आले आहे.