Drishyam 2 Review
Drishyam 2 Review Team Lokshahi
मनोरंजन

Drishyam 2 Review : शेवटपर्यंत खेळवून ठेवणारा सस्पेन्स आणि जबरदस्त क्लायमॅक्स

Published by : Pankaj Prabhakar Rane

“शब्दो पे नही दृश्यो पे ध्यान दो...” असाच दृश्यांवर खिळवून ठेवणारा दृश्यम 2 हा सिनेमा आहे. एकापेक्षा एक ट्विस्ट, जबरदस्त क्लायमॅक्स, सीन्सचा थरार, सस्पेन्स या जोरावर या चित्रपटाने लक्ष वेधून घेतलय. 2013 मध्ये आलेल्या मल्याळम फिल्म ‘दृश्यम’चा रिमेक निशिकांत कामत घेऊन आले. त्या दृश्यमला मिळालेल्या यशानंतर आता त्याचा दुसरा भाग दृश्यम 2 प्रदर्शित झालाय. अभिषेक पाठक यांचं दिग्दर्शन असलेला हा दुसरा भाग देखील मल्याळम चित्रपटाचा रिमेक असून त्याला अधिक रंजक करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

गोव्यात केबल टीव्ही सर्व्हिस चालवणाऱ्या विजय साळगावकर आणि त्याच्या परिवारासोबत घडलेली घटना पहिल्या भागात पाहायला मिळाली. त्या घटनेचे विविध पैलू आणि पुढील कथानक या दुसऱ्या भागात पाहायला मिळतय. आपला मुलगा सॅमच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मीरा पुन्हा येते मात्र विजय साळगावकर या सगळ्यात पुन्हा काय नवी शक्कल लढवतो हे पाहणं रंजक ठरतय. आयजी तरुण अहलावत या केसमध्ये नवी उडी घेतो ज्याने या कथेला वेगळं वळण मिळतं. या सगळ्यात विजय साळगावकर नेमकी काय कबुली देतो, त्याचं कुटुंब या प्रकरणात पुन्हा अडकतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरतय.

दमदार पटकथेच्या जोरावर या चित्रपटाने लक्ष वेधून घेतलय. मल्याळम चित्रपटाचा रिमेक जरी असला तरी चित्रपट मांडणी कौशल्य उत्तम असल्याने त्याचं सादरीकरण चांगलं झालय. जितू जोसेफ यांनी लिहीलेल्या मूळ कथेला दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी न्याय दिलाय. चित्रपटाच्या कथानकाचं सादरीकरण विविध सीन्समधून थरारक अनुभव देणारे आणि क्लायमॅक्सपर्यंत सस्पेन्स कायम ठेवणारे आहेत.

दुसऱ्या भागातही पहिल्या भागातील कलाकार पाहायला मिळतात. मात्र त्यात अनेक नव्या भूमिकांमधून विविध कलाकारांचा सहभाग करण्यात आलाय.अभिनेता अजय देवगणने साकारलेला हुशार, चलाख मात्र चेहऱ्यावरुन साधाभोळा वाटणारा विजय साळगावकर दुसऱ्या भागातही लक्ष वेधतो. संवादातून अजयने पुन्हा एकदा त्याच्या हटके स्टाईलने बाजी मारलीय. अजयचं हटके संवादकौशल्य पुन्हा एकदा लक्ष वेधतय तर विजय साळगावकरची देहबोली त्याने उत्तम सादर केलीय.

Drishyam 2 Movie Review

या चित्रपटात आयजीच्या भूमिकेत अक्षय खन्नाची एन्ट्री कथेला नवं वळण देतेय. अक्षयनेही ही भूमिका चोख बजावलीय. विजयच्या पत्नीच्या भूमिकेत श्रीया सरन झळकतेय. मात्र तिच्या भूमिकेला बराच वाव असतानाही तिच्या भूमिकेतून इतका प्रभाव वाटत नाही. इशिता दत्ता आणि मृणाल जाधव या दोन्ही साळगावकरच्या मुलींच्या भूमिकेत दिसतायत. त्यांच्या वाट्याला आलेला काम त्यांनी चोख बजावलय. मीरा देशमुखच्या भूमिकेत तब्बू दुसऱ्या भागातही झळकतेय. सीन्स कमी असले तरी तब्बू प्रत्येक सीनमध्ये भाव खाऊन जाते. रजत कपूर, सौरभ शुक्ला, कमलेश सावंत, योगेश सोमन, नेहा जोशी, प्रथमेश परब यांनीही भूमिकांना न्याय दिलाय. अभिनेता सिद्धार्थ बोडकेच्या कामाचा विशेष उल्लेख. त्याची महत्त्वाची भूमिका असून त्याने अभिनयकौशल्याने उत्तम काम केलय.

चित्रपटाची तांत्रिक बाजू मजबूत वाटतेय. संदीप फ्रान्सिस यांचं संकलन या चित्रपटाची जमेची बाजू आहे. चित्रपटाला दिलेला कलर टोन थरार आणि सस्पेन्स टिकवण्यात महत्त्वाची धुरा सांभाळतय. देवी श्री प्रसाद यांचं संगीतही छान झालय आणि कथेला साजेसं आहे. सुधीर चौधरी यांचं छायाचित्रणही चांगलं झालय. मात्र कथेचा विचार करता छायाचित्रणात प्रयोग करण्यासाठी आणखी वाव असल्याचं जाणवतं. चित्रपटाच्या पटकथेची अचूक मांडणी, सस्पेन्स शेवटपर्यंत टिकवणं, क्लायमॅक्सचं उत्तम सादरीकरण या सगळ्यात हा चित्रपट यशस्वी ठरल्याने तो अधीक रंजक आणि मनोरंजक वाटतो.

रेटिंग – 3 स्टार्स

पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीला थेट इशारा, साताऱ्यात म्हणाले, "मी जिवंत आहे, तोपर्यंत..."

IPL मध्ये जॅक्सने दाखवली 'विल'पॉवर! ख्रिस गेलचा दहा वर्षांपूर्वीचा 'हा' विक्रम मोडला

Rahul Shewale: 'कॉंग्रेसच्या विचारांचा पराभव करायचायं' अर्ज दाखल करण्यापूर्वी शेवाळेंची प्रतिक्रिया

Harbour Local: हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; CSMT जवळ लोकलचा डबा घसरला

सोलापूरमध्ये PM नरेंद्र मोदींचं 'इंडिया'आघडीवर शरसंधान, म्हणाले; "देशाला भ्रष्टाचार, दहशतवादात..."