अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) सध्या फुकरेंच्या पुढील भागाची शूटिंग करत आहेत. यादरम्यान त्यांनी सेटवरून वेळ काढून भारतातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थापैकी एक आयआयटी (IIT) खडगपूरला भेट दिली. तिथे त्यांनी भाषण दिले व विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना जीवन आणि करिअर याविषयी निश्चित ध्येय असायला हवे, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
भारतातील अशा प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेत भाषण करणे, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. युवकांना प्रेरित करणे, हे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यात आपण आज ज्या पिढी सोबत जगतो आहोत त्यांना सांगणे तर अधिक आव्हानात्मक आहे. कारण आजकालची जास्तीत जास्त मुले आपल्या भविष्याविषयी जागरूक असतात. आपण काय करायला हवं आणि काय नाही. याची त्यांना चांगलीच जाणीव आहे, असे पंकज म्हणाले.
आजकाल विद्यार्थी फक्त अनुभवातून शिक्षण घेऊ शकतात. कारण आजची पिढी आधुनिक आणि प्रगतिशील आहे. परंतु यामुळे ते तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेत. पंकज पुढे बोलतांना म्हणाले की, टू वे कम्युनिकेशन (Two way communication) व्हायला हवे, असे मला नेहमी वाटायचे. जो अनुभव जुन्या पिढीने घेतला. त्यांनी अनेक वर्षांपासून जे बघितले. ते आजची पिढी बघू शकत नाही. नवीन पिढी आणि अनुभवी लोकांमधील ज्ञान ज्यावेळी आदान-प्रदान होईल. त्यावेळी युवा पिढीला याचा फायदा नक्कीच होईल.