प्रसिद्ध युट्यूबर समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लॅटेंट' पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकताच त्याचा नवीन एपिसोड समोर आला आहे. यामध्ये युट्यूबर आशिष चंचलानी, जसप्रीत सिंह व रणवीर अलाहबादिया यांनी हजेरी लावली होती. यावेळी राणवीर अलाहबादिया याने केलेल्या वक्तव्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे.
या कार्यक्रमामध्ये रणवीरने आई-वडिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर रणवीरला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून समय रैनासह अनेकांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलं आहे.
याप्रकरणी रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मखिजा, समय रैना आणि 'इंडिया गॉट लेटेंट'च्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या वादावर समय रैनाने भाष्य करत इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व व्हिडिओ त्याच्या चॅनलवरून काढून टाकल्याचे म्हटलं आहे. या सगळ्या वादावर समय रैनाने मौन सोडलं आहे. इन्स्टा पोस्टमधून समय रैनानं आपलं म्हणणं मांडलं आहे.
समय रैनाने इन्स्टाग्राम स्टोरी
समय रैनाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे की, "हे सर्व घडत आहे ते हाताळणे माझ्यासाठी खूप कठीण होत आहे. मी माझ्या चॅनलवरून इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व व्हिडिओ काढून टाकले आहेत. लोकांना हसवणे आणि त्यांचा चांगला वेळ जावा हेच माझे ध्येय होते. मी तपास यंत्रणांना सहकार्य करेन जेणेकरून त्यांचा तपास निष्पक्षपणे होईल. धन्यवाद," असं म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.