डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
आपण जरी फळांचा राजा म्हणून आंब्याची निवड करत असलो, तरी आयुर्वेदामध्ये द्राक्षा फलोत्तमा म्हणजे द्राक्ष हे सर्वोत्तम फळ असतं असं सांगितलेलं आहे. ताजी द्राक्षं हंगामी म्हणजे तीन-चार महिनेच मिळतात पण त्यापासून बनवलेल्या मनुका मात्र वर्षभर उपलब्ध असतात. आयुर्वेदात मनुका म्हटलं की एक तर त्या काळ्या मनुका असतात आणि दुसरं म्हणजे त्या सबीज असाव्या लागतात. बी नसलेला मनूका औषधात वापरल्या जात नाहीत. अनेक शक्तीवर्धक औषधांमध्ये मनुकांचा समावेश असतो कारण सेवन केल्यावर लगेचच शक्ती देण्याचा त्यांच्यामध्ये गुण असतो.
एखाद्या दिवशी खूप झालं असेल, श्रमामुळे अंग दुखत असेल तर झोपण्यापूर्वी १ मूठभर मनुका खाव्यात, वरून दोन घोट पाणी प्यावं आणि झोपून जावं. सकाळी उठल्यावर श्रम परिहार झाल्याचा जाणवतो. तोंडाला चव आणण्यासाठीही मनुका श्रेष्ठ असतात. मूठभर मनूका थोड्याशा तुपावर परतून घेतल्या आणि त्यावर थोडंसं सैंधव लावून खाल्ल्या तर अतिशय चवदार लागतात आणि पचायला अजूनच हलक्या होतात. त्यामुळे पचतील तितक्या, म्हणजे साधारण १ ते दिड मूठभर मनूका रोज खाल्ल्या तर काही दिवसातच सप्तधातूंचं पोषण होऊ लागतं आणि शरीरशक्तीत सुधारणा होते.
चक्कर येत असेल, हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे डोळ्यासमोर अंधारी येत असेल तर त्यावरही अशा परतलेल्या आणि चवीपुरतं सैंधव लावलेल्या मनूका खाण्याचा उपयोग होतो. कोणत्याही मोठ्या आजारपणानंतर, विशेषतः ताप येऊन गेल्यानंतर जी अशक्तता येते त्यावर रोज सकाळी मूठभर मनुका खाण्याचा आणि वरून दूध पिण्याचा उपयोग होतो. यामुळे शक्ती तर वाढतेच पण भूक सुधारते, पोट साफ होऊ लागतं आणि तापाचा अवशेष शरीरात शिल्लक राहत नाही.
मनुका चक्षुष्य म्हणजे डोळ्यांसाठी हितकर असतात, असंही आयुर्वेदात सांगितलेलं आहे त्यामुळे नित्य जागरण केल्यामुळे ज्यांचे डोळे लाल होतात, जळजळतात किंवा सतत चमकदार स्क्रीनचा वापर केल्यानी ज्यांचे डोळे थकतात, दुखतात त्यांच्यासाठी मनुका हे उत्तम औषध असतं. मघाशी सांगितल्याप्रमाणे तुपावर परतलेल्या मूठभर मनुका थोडसं सैंधव लावून खाण्यानी आणि नियमित पादाभ्यंग करण्यानी लवकरच डोळ्यांमधली उष्णता कमी होते.