लग्न म्हणजे दोन व्यक्ती आपल्या नव्या नात्याची सुरुवात करण्यासाठी पार पाडतात तो पवित्र विधी. मात्र, सध्या या विवाहित जोडप्यांमध्ये काही शुल्लक कारणांवरुन झालेले वाद टोकाची भूमिका घेतात ज्यात ते आपल्या जोडीदाराच्या जिवाववर उठलेले पाहायला मिळतात. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातील दौंड तालुक्यातील खामगाव येथे घडली आहे. होणारा नवरा पसंत नसल्याने नवरीनेच गुंडांना दीड लाख रुपयांची सुपारी देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
नेमकं प्रकरण काय?
नवरा मुलगा सागर कदम हा एका हॉटेलमध्ये कुक असून सागर आणि मयुरी दांडगे यांचा विवाह होणार होता मात्र मयुरीला तिचा होणारा नवरा सागर कदम हा आवडला नव्हता त्यामुळे तिने सागरला जिवे मारण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी दिली होती. ज्या लोकांना तिने सुपारी दिली होती त्यांनी सागरला चित्रपट पाहण्यासाठी मयुरीच्या मामाच्या घरी खामगाव फाटा या ठिकाणी बोलवून घेतले.
त्यानंतर सागर तिथे गेल्यानंतर त्याला "तू मयुरीसोबत लग्न केले तर तुला दाखवतो", अशी धमकी देण्यात आली आणि त्यानंतर सागरला लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. यानंतर सागरने यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि नंतर याप्रकरणासंबंधी पाच आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे अधिकची चौकशी केली असता, असं समोर आलं की, मयुरी म्हणजेच नवरी मुलीने हा सगळा कट रचून आणला होता. यातील पाच आरोपींना अटक करण्यात आले असून भावी वधु मयुरी ही अद्याप फरार आहे.