राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल आज जाहीर झाले असून, या निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजप सर्वाधिक आघाडीवर असून 12 पैकी तब्बल 8 जिल्हा परिषदांवर भाजपचे अध्यक्ष विराजमान होणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.
या यशावर प्रतिक्रिया देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यात भाजपचा विश्वास जनतेने पुन्हा एकदा मजबूत केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासकामांचा थेट फायदा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यात आला, त्यामुळे मतदारांनी महायुतीला साथ दिली, असं ते म्हणाले.
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला मिळालेल्या यशाबाबत बोलताना बावनकुळे यांनी अजित पवारांवरील जनतेच्या विश्वासाचा उल्लेख केला. पुणेकरांनी दिलेलं मत हे महायुतीच्या बाजूनेच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आगामी काळात काही ठिकाणी भाजप, काही ठिकाणी शिंदे गट तर काही ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष असतील, असंही ते म्हणाले.
महाविकास आघाडीवर टीका करताना बावनकुळे यांनी काँग्रेसच्या अपयशाकडे बोट दाखवलं. नकारात्मक प्रचारामुळे काँग्रेसला फटका बसला असून विकासाचा ठोस अजेंडा नसल्याने जनतेचा पाठिंबा मिळू शकला नाही, असा टोला त्यांनी लगावला. आता विरोधकांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचंही ते म्हणाले.
थोडक्यात
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल आज जाहीर.
महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे.
भाजप सर्वाधिक आघाडीवर.
12 जिल्हा परिषदांपैकी 8 वर भाजपचे अध्यक्ष विराजमान होणार.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की:
राज्यात भाजपचा विश्वास जनतेने पुन्हा एकदा मजबूत केला.
केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांचा थेट फायदा ग्रामीण भागापर्यंत पोहोचला.
मतदारांनी महायुतीला साथ दिली.