कोरोना काळात मागील काही महिन्यांपासून बंद असलेली मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
पंचवटी एक्स्प्रेस ही विशेष प्रवासी गाडी आजपासून पुन्हा मनमाड रेल्वे स्थानकावरून धावू लागली आहे. नाशिक
जिल्ह्यातील नोकरदारांची भिस्त असलेल्या मनमाड – नाशिक – मुंबई पंचवटी एक्स्प्रेस या गाडीतून जिल्ह्यातील हजारो प्रवासी दैनंदिन ये जा करायचे.
कोरोना काळात काही महिने रेल्वे वाहतूक बंद राहिल्याने चाकरमाने, व्यावसायिक, नोकरदार यांची मोठी अडचण यामुळे झाली होती.आज पुन्हा एकदा पंचवटी एक्स्प्रेस सुरू झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला.. केवळ तिकीट आरक्षित असलेल्या व्यक्तीलाच या गाडीमधून प्रवास करता येणार असून पासधारकांना मात्र यातूून प्रवास करता येणार नाहीये..पंचवटी एक्स्प्रेस सोबतच जालना – मुंबई जनशताब्दी ही विशेष एक्सप्रेसही आजपासून धावणार आहेत.दोन्ही विशेष गाड्यांसाठी आरक्षण मिळण्यास सुरुवात झाली असून संगणकीकृत आरक्षण केंद्र आणि रेल्वेच्या संकेतस्थळावर आरक्षित तिकीट मिळवता येईल. दोन्ही गाड्यांचा मार्ग, वेळ आणि थांबे यात कोणताही बदल राहणार नाही. प्रवाशांना स्थानक, प्रवासादरम्यान कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.