अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे राज्यातील दहावीचा निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अंतिम निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर करण्यात येईल, असे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दोन आठवड्यांत म्हणजे जुलैअखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अकरावीसाठी प्रवेश परीक्षा होईल, असे विभागाने स्पष्ट केले आहे.
सर्व मंडळांच्या सर्व शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी बंधनकारक आहे. मात्र, प्रवेश परीक्षेत मराठीला स्थान दिलेले नाही. भाषांमध्ये फक्त इंग्रजीचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान इंग्रजी प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा यांसाठी प्रश्नपत्रिकेचे एकच स्वरूप असणार का, याबाबतही संदिग्धता आहे.