कोल्हापूर : वटपौर्णिमा पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी महिला वर्ग मोठ्या प्रमाणत साजरी करतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते, असे सांगितले जाते. आज राज्यभरात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. परंतु, कोल्हापूरात वटपौर्णिमा साजरी करताना वडाच्या झाडालाच आग लागल्याने खळबळ उडाली आहे.
अंबाबाई मंदिर परिसरात वटपौर्णिमेनिमित्त महिलांकडून पूजा सुरू असताना झाडाने अचानक पेट घेतला. यामुळे मंदिर परिसरातील यंत्रणेची एकच तारांबळ उडाली होती. कापूर आणि उदबत्ती पूजेनिमित्त बांधलेल्या दोऱ्याला लागल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निरोधक मशीनच्या सहाय्याने ही आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.