(Farmers ) राज्यातील 20 लाख 37 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज फेडलेले नसून, थकबाकीची रक्कम तब्बल 31,254 कोटी इतकी झाली आहे. ही माहिती राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालातून समोर आली आहे. बीड, बुलढाणा, जालना, नांदेड, परभणी आणि यवतमाळ या जिल्ह्यांत प्रत्येकी दीड लाखांहून अधिक शेतकरी कर्ज थकवणाऱ्यांच्या यादीत आहेत.
खरीप हंगाम सुरू असूनही अनेक बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. सरकारने सिबिल स्कोअरकडे दुर्लक्ष करण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात बँका सिबिल तपासूनच कर्जवाटप करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनामुळे अनेक शेतकरी कर्जफेड करण्याऐवजी माफीची वाट पाहत आहेत.
राज्यातील एकूण 1.29 कोटी शेतकऱ्यांपैकी जवळपास 20 लाख शेतकरी कर्ज थकवलेले असून, त्यामुळे त्यांना बँकांकडून नवीन कर्ज मिळण्यास अडथळा निर्माण झाला आहे. अतिवृष्टी, हमीभावाचा अभाव, उसाचे अपूर्ण पैसे आणि निसर्गाच्या तडाख्यामुळे त्यांची स्थिती आणखी बिकट झाली आहे.
राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक थकबाकी आहे. यामध्ये नाशिक (2790 कोटी), सोलापूर (2681 कोटी) आणि यवतमाळ (2256 कोटी) जिल्ह्यांचा समावेश आहे.