(Shivraj Singh Chouhan ) केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशभरात नऊ ठिकाणी रोगमुक्त व उच्च प्रतीची रोपे तयार करणारी स्वच्छ रोप निर्मिती केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रात तीन केंद्रांचा समावेश असून, पुणे, नागपूर आणि सोलापूर येथे ही केंद्रे उभारली जातील, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली.
शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या शेतांवर जाऊन पाहणी केल्यानंतर रोगमुक्त रोपांची कमतरता ही मोठी अडचण असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उत्पादनात घट आणि खर्चात वाढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. पुण्यात द्राक्षासाठी, नागपुरात संत्र्यासाठी आणि सोलापुरात डाळिंबासाठी ही केंद्रे कार्यरत राहणार आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ही घोषणा त्यांनी पुण्यात पार पडलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉनच्या समारोपप्रसंगी केली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादनमंत्री भरत गोगावले आणि कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ही नवीन केंद्रे सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व रोगप्रतिरोधक रोपे सहज उपलब्ध होतील. यामुळे उत्पादन वाढीस चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्यही मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना केवळ दर्जेदार रोपेच नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञानाची साथही मिळणार आहे. शेतीत नावीन्याला चालना मिळून तरुण पिढीलाही शेतीकडे वळण्यास प्रोत्साहन मिळेल. स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीची संधी वाढेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळेल.