(Rahul Gandhi) लोकसभा निवडणुकीत मतचोरीचा आरोप केल्याबद्दल काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना कर्नाटक राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) यांनी नोटीस बजावली आहे.राहुल गांधींनी नुकत्याच दिल्लीतील एका परिषदेत असा दावा केला होता की, बंगळुरूतील महादेवपूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मतदार यादीतील अनियमितता आणि मत चोरी झाली. यासाठी त्यांनी 70 वर्षीय महिला मतदार शकुन राणी यांचे उदाहरण दिले. राहुल गांधींचा आरोप असा होता की शकुन राणी यांनी दोन वेळा मतदान केले. त्यांनी या संदर्भात काही कागदपत्रेही दाखवली.
मात्र, प्राथमिक चौकशीत शकुन राणी यांनी हा आरोप फेटाळून लावत, “मी केवळ एकदाच मतदान केले” असे स्पष्ट केले. तसेच राहुल गांधींनी सादर केलेला ‘टिक-मार्क’ असलेला दस्तऐवज हा अधिकृत मतदान अधिकाऱ्याने दिलेला नसल्याचे आढळले. त्यामुळे आयोगाने राहुल गांधींना संबंधित सर्व मूळ पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.मतचोरीच्या आरोपासंदर्भात शपथपत्र देण्याचे निर्देश देण्यात आले असून 10 दिवसांत शपथपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
भारतीय निवडणूक प्रक्रियेत दुहेरी मतदान हा गंभीर गुन्हा मानला जातो. दोषी आढळल्यास भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत कारवाई आणि मतदार यादीतून नाव वगळण्याची तरतूद आहे.