कणकवली तालुक्यातील करंजे–साटमवाडी येथे उभारण्यात आलेल्या 'गोवर्धन गोशाळा कोकण प्रकल्पा'चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. सुमारे 70 एकर जागेत उभा राहिलेला हा प्रकल्प देशी गायींच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे ते म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार निलेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, "देशी गोवंशाचे संरक्षण हे नैसर्गिक शेतीच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. कोकणातील ही गोशाळा केवळ गोसेवेपुरती मर्यादित नसून, ती सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणपूरक विकासाचे केंद्र बनू शकते. या प्रकल्पात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय कृषी पर्यटन, जैविक उत्पादने निर्मिती आणि दुग्ध व्यवसायालाही चालना देण्यासाठी विविध केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे".
'गोवर्धन गोशाळा कोकण' प्रकल्प कै. तातू सीताराम राणे ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात आला असून, स्थानिक गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हा त्यामागचा उद्देश आहे. गोमातेच्या उपयुक्ततेचा केंद्रबिंदू मानून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणे, हा या उपक्रमाचा मूळ हेतू आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गोशाळेला ‘मॉडेल प्रकल्प’ असे संबोधून, या उपक्रमातून कोकणात धवल क्रांतीचा पाया घातला जात असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसोबतच नैसर्गिक संसाधनांचा समतोल राखत समृद्धीचा मार्ग शोधण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल असे प्रतिपादन केले. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गसारख्या निसर्गसंपन्न भागात रोजगारनिर्मिती, जैविक शेती आणि ग्रामीण पर्यटनाला चालना मिळणार आहे.