(Devendra Fadnavis) राज्यात लवकरच मोठ्या प्रमाणावर मेगा भरतीची प्रक्रिया राबवली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. राज्य सरकारकडून सध्या 150 दिवसांची उद्दिष्टपूर्ती मोहीम राबवण्यात येत असून, त्यानंतर रिक्त पदांची अचूक माहिती समोर येईल आणि त्यानुसार मोठ्या प्रमाणावर नोकरभरती सुरू केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा सदस्य भीमराव केराम यांनी या मुद्द्यावर लक्षवेधी सूचना सादर केली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, 150 दिवसांच्या कार्यक्रमात विविध विभागांनी आकृतीबंध पुनरावलोकन, नियुक्ती धोरणांचे अद्ययावतीकरण आणि अनुकंपा तत्वावर 100 टक्के भरती पूर्ण करणे अशी उद्दिष्टे पूर्ण करायची आहेत. ही उद्दिष्टे पार पडल्यानंतरच व्यापक मेगाभरती प्रक्रिया राबवली जाईल.
यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या 75 हजार पदांच्या भरतीत प्रत्यक्षात 1 लाखांहून अधिक पदे भरली गेली आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गातील जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या, पण 20 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या 6860 कर्मचाऱ्यांच्या पदांना अधिसंख्य मान्यता देण्यात आली आहे. हे कर्मचारी पदोन्नतीस पात्र ठरणार नसले तरी त्यांची सेवा कायम राहणार असून, सेवानिवृत्तीनंतर ही पदे रिक्त म्हणून घोषित केली जातील.
अनुसूचित जमातीसाठी आरक्षित 1343 पदांपैकी काहींवर भरती पूर्ण झाली असून उर्वरित भरती प्रक्रियेत आहे. तसेच जाती प्रमाणपत्रांची तपासणी पारदर्शक आणि जलद होण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सरकारचा मानस असून, यासाठी सचिवांचा विशेष गट तयार केला जाणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील अनुसूचित जमातींसाठी राखीव पदांचीही भरती होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.