मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. विशेषतः कल्याण आणि डोंबिवली परिसरात पावसाची संततधार सुरू असून, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडी परिसरात रविवारी मोठी दुर्घटना घडली. जय भवानीनगर भागात पोलीस स्टेशनच्या पाठीमागील टेकडीचा भाग कोसळून दोन ते तीन घरांवर दरड कोसळली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
दरड कोसळल्यामुळे घरांचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, दरड कोसळण्याच्या अगोदरच घरातील सदस्य बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन बचावकार्य केले.
या दुर्घटनेनंतर महापालिका व पोलिसांनी परिसरात मदतकार्य सुरू केले असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे टेकडीभागातील माती सरकण्याची शक्यता वर्तवली जात असून, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरड कोसळल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून, अजूनही टेकडी भागात धोक्याची स्थिती कायम आहे. महापालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक ठिकाणांची तपासणी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पावसाळ्यात डोंगरकड्यालगत असलेल्या वस्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.