ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याची बोटं छाटणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हल्लाबोल चढवला आहे. "ठाण्यात परप्रांतिय फेरीवाल्याने अधिकाऱ्यावर हल्ला केला. पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील, फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा यांना कळेल, यांची हिंमत कशी होते? निषेधाने हे सुधारणारे नाहीत." असं राज ठाकरे म्हणाले.
पाहा राज ठाकरे काय म्हणाले?
"यांची हिम्मत कशी होते? तुम्ही बोटं छाटता? आज पकडलेत, उद्या बेल होईल, पुन्हा हे बोटं छाटायला बाहेर. सरकार कशासाठी आहे? सरकारने यावर बंधनं आणली पाहिजेत. हे काय फक्त मुंबईत होत नाही. इतक्या वर्षात कुणाची हिंमत झाली नाही बोटं छाटायची. हे सहीसलामत बेलवर सुटणार. यांना भीती काय आहे हे पोलिसातून बाहेर आल्यावर कळेल." असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
नक्की काय आहे प्रकरण?
ठाणे महापालिकेतील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी कल्पिता पिंपळे गेल्या होत्या. या कारवाईच्या दरम्यान अमरजित यादव या फेरीवाल्याकडून त्यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला करण्यात आला. यावेळी बचावासाठी त्यांनी हात वर केल्याने त्यांची दोन बोटेच तुटून पडली, तर बचावासाठी धावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले आहे. कल्पिता पिंपळे यांना सुरुवातीला जवळच्याच वेदांत रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तर आरोपी अमरजित यादव याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.