राजकारण

तीन राज्यात भाजप आघाडीवर; पंतप्रधान मोदींवर उधळली अजित पवारांनी स्तुतीसुमने

भाजपने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यात आघाडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

रायगड : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार भाजपने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यात आघाडी घेतली आहे. तर, तेलंगणा राज्यात कॉंग्रेस आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप म्हणजे रडीचा डाव. मागील सरकारमध्ये मी पण होतो. ईव्हीएम घोटाळ्यावर माझा अजिबात विश्वास नाही. ईव्हीएममध्ये एक व्यक्ती गडबड करू शकत नाही. एवढ्या मोठ्या भारतात हे घडलं असतं तर लगेच कळलं असतं, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

मोदी यांच्या समोरील व्यक्ती देखील इंडिया आघाडीने निवडलेला नाही. मोदी 16-18 तास काम करतात, त्यांनी घरी कधी दिवाळी साजरी केली नाही. जवांनासोबत दिवाळी साजरी करतात. परदेशातून आल्यावर लगेच फिल्डवर असतात. चांद्रयानवर आपण पोहोचलो. त्यांना मोदींनी प्रोत्साहन दिलं. जर एखाद्या गोष्टीत यश मिळालं तर तिथं त्यांचे कौतुक करतात. जर अपयश आलं तर आधार द्यायला जातात. या गोष्टी आपण उघड्या डोळ्यांनी पाहिल्यात. लोकांना या गोष्टी आवडतात. त्यामुळे भाजपला चेहरा नाही अशी टीका केली जाते. परंतु, नरेंद्र मोदी हाच भाजपचा चेहरा आहे, अशी स्तुती अजित पवारांनी पंतप्रधान मोदींची केली आहेत.

शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर आत्मचरित्रसंदर्भात केलेल्या टीकेवर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी काय बोलल्यावर त्यांनी बोलायचं, त्यानी बोलल्यावर मी उत्तर द्यायचं असला खेळ खंडोबा मी करत नाही. मी जे बोललो त्या गोष्टी त्रिवार सत्य आहेत. 2 जुलैला मी शपथ घेतली. अधिवेशन काळात आम्ही मंत्री चव्हाण प्रतिष्ठानला गेलो जर आमच्यावर राग होता तर आम्हाला येवू द्यायचं नव्हतं. हे लक्षात तुमच्या तरी येतंय का? दुसऱ्या दिवशी सगळे आमदार गेले. ऑगस्टमध्ये पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचे उद्घाटन केले. त्यांच्यानंतर मी कुठं गेलो उद्योगपतीच्या घरी, व्यापाऱ्याच्या नाही हेही त्रिवार सत्य आहे.

माझ्याकडून एखादी चुकीची गोष्ट झाली तर मी दिलगिरी व्यक्त करतो. पण मी शिबिराच्या निमित्ताने जे बोललो ते खरंच बोललो. माझा महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे. माझं राजकारण त्यांना माहिती आहे. मी छक्के पंजे करत नाही. मी स्पष्ट भूमिका घेणारा माणूस आहे. आज एक बोलायचं उद्या एक बोलायचं हा माझा स्वभाव नाही. प्रफुल्ल भाईंच्या बाबतीत जे आहे त्याला प्रफुल्ल भाईच उत्तर देतील, असे त्यांनी म्हंटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा