राज्यात सध्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युध्द सुरू असताना दुसरीकडे औरंगजेबवरून प्रचंड गदारोळ सुरू आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण आणि त्याला सरकारकडून छुपा पाठिंबा दिला जातोय असा आरोप विरोधकांकडून होत असतांना आता ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला आव्हान दिले आहे. औरंगजेबचा भारतीय जनता पक्षाला एवढाच तिटकारा आहे, तर त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेब याच्या कबरीला असलेल्या संरक्षित स्मारकाचा दर्जा काढवून दाखवावा, असे आव्हान त्यांनी दिले.
औरंगजेब याच्या कबरीला असलेल्या संरक्षित स्मारकाचा दर्जा काढवा याबाबत दानवेंनी ट्विटरच्या माध्यमातून आव्हान केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, 'बाटलीतून भूत' बाहेर काढावे तसा हा औरंग्या सत्ताधारीच आज शिवरायांच्या महाराष्ट्रात उभा करत आहेत. शत्रूची भीती दाखवून मत मागण्याची तुमची जुनी सवय जनता ओळखते. मग तो औरंगजेब असो की पाकिस्तान. कारवाईची भाषा करणाऱ्यांनी संभाजीनगरात हे पोस्टर नामांतर आंदोलनात पहिल्यांदा दिसले तेव्हा त्यावर काय कारवाई केली, की विसर पडला तुम्हाला याचा? असा सवाल त्यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, अल्पवयीन मुले यात सापडत आहेत. ते स्वतःचा मेंदू वापरून हे कृत्य करणे शक्य वाटत नाही. त्यांचा ब्रेनवॉश करणारी यंत्रणा कोण आहे याकडे 'पार्टी विथ डिफ्रन्स' जाणीवपूर्वक नजरेआड करते. मांजर डोळे मिटून दुध पिते पण तिला जग पाहत असते, हे विसरू नका. हनुमंताची साथ कर्नाटकात मिळाली नाही म्हणून महाराष्ट्रात तुमचीच धाव औरंग्याकडे सुरू आहे. स्वतःला सज्जन भासवून दुसऱ्याला दुर्जन म्हणणं फार दिवस चालत नसतं. आम्हाला तर आहेच, तुम्हाला तिटकारा असेल या पापी राजाचा, तर त्याच्या कबरीला असलेला संरक्षित स्मारकाचा दर्जा काढण्याची शिफारस करणारे एक साधे पत्र तुमच्या दिल्लीश्वर दैवताला लिहिण्याची हिम्मत तर दाखवा! असे आव्हान त्यांनी दिले.