मुंबई : राज्यात महापालिकेचे निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशात मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जात आहे, अशी टीका शिवसेना सातत्याने भाजवर करत आहेत. याला भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत नितेश राणे यांनी टक्केवारी देणाऱ्या आणि जनतेला वेठीस धरणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
काय आहे नितेश राणे यांचे पत्र?
मनपाच्या निवडणूका जवळ आल्या आहेत आणि परत सताधारी आदित्यसेनेनं मुंबई महाष्ट्रापासून तोडणार व मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करणार, अशा उलटा बोंबा मारणं सुरू केले आहे. परंतु, वास्तविक यांच्या जवळच्याच असलेल्या टक्केवारी मिळवून देणाऱ्या विकासकांमुळे मुंबईकर नाईलाजास्तव मुंबईतून हद्दपार झाला आहे, असा निशाणा राणेंनी आदित्य ठाकरे यांच्यावर साधला आहे.
पुर्नविकास नियंत्रण नियमावली अंतर्गत भाडेकरू तथा एस.आर.ए. मधील झोपडपटटी धारक खासगी विकासकांची नेमणूक करतात. या पद्धतीच्या अनेक पुर्नविकास प्रकल्पांमध्ये विकासक एक ते दीड वर्षांचे पर्यायी जागेचे भाडे देणे कबूल करतात. परंतु, अनेक गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये अनेक विकासकांची कामे रखडल्याने त्यांनी भाडेही देणे बंद केले आहे.
एका बाजूला कोविडमुळे मराठी बांधवांची रोजीरोटी गेली आणि दुसऱ्या बाजूला मुंबईतील मराठी माणसात आपल्या आयुष्यातील सहा सहा तास वसई विरारच्या प्रवासात घालवावे लागतात. राहत आहेत ते मूळ घर विकासकाने अडवून ठेवलंय आणि भाडे मिळण्याअभावी घरातून हकालपट्टी होतेये. काही ठिकाणी तर इमारत तयार असूनही ना इमारत ताब्यात मिळतेय ना हक्काचे भाडेही मिळतेय. त्यामुळे नाईलाजास्तव मराठी कुटुंब आपले हक्काचे घर विकासकला किंवा एजंटला स्वस्त दरात विकण्यास बाध्य होतात. अशा प्रकरणांमध्ये सरकारच्या वतीने ठोस पावले उचलून जनतेला वेठीस धरणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणात आपण लक्ष घालून सर्वसामान्य मराठी माणसाला न्याय मिळवून द्यावा, ही विनंती, अशी मागणी नितेश राणे यांनी पत्रातून केली आहे.