मुंबई : मोदी सरकारविरोधात देशभरातील विरोधी पक्ष ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली आहे. यानंतर पत्रकार परिषदेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.
नितीश कुमार म्हणाले, केंद्र सरकार काम कमी करते, त्याबद्दल छापते जास्त. त्यांना देशाचा इतिहास बदलायचा आहे. आम्ही इतिहास बदलू देणार नाही. कोणतेही काम न करता त्याचे कौतुक केले जात आहे. फक्त फुशारकी मारतात. ठिकठिकाणी जाऊन ते अपप्रचार करत आहेत.
आम्ही सर्व मिळून काम करू. मजबूत राहू. समाजातील प्रत्येक घटकाची उन्नती होईल. कोणाचीही उपेक्षा होणार नाही. आपण भेटण्याचा प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे आहे. आम्ही जलदगतीने काम करावे अशी आमची इच्छा आहे. आज आम्ही वेगाने कामाला लागण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक वेळेआधी होऊ शकतात, असेही नितीश कुमार यांनी म्हंटले आहे.